कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री , दोन खासदार आणि डझनभर आजी – माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात ( गोकुळ ) पुन्हा सत्तारुढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसलाआज होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे .थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता गोकुळच्या मतमोजणीच्या दिशेने केंद्रित झाले आहे. गोकुळ वर सत्ता असणे म्हणजे कोल्हापूर जिल्हावार सत्ता असण्यासारखे असल्याने गोकुळच्या निवडीला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. Gokul Eletion Counting begins
गोकुळच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीकडून विजयाचा दावा केल्याने या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला लागून राहिली आहे . ‘ गोकुळ’च्या निवडणुकीसाठी रविवारी 99.78 टक्के मतदान झाले आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 70 केंद्रावर हे मतदान झाले . यापैकी सात तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले . एकूण 3647 मतदारांपैकी 3639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . त्यामुळे , सत्तारुढ आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील , असा सत्तारुढ गटाला आणि या वेळी सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधी आघाडी गोकुळमध्ये सत्तांतर करेल , असा विरोधी पॅनेलने दावा केला आहे.
कोणी कितीही शक्ती प्रदर्शन केले तरी विजय हा आमचाच असणार अशा ठाम विश्वास सत्तारुढचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी तर , गोकुळच्या निवडणुकीत शंभर टक्के सत्तांतर होणार , असा विश्वास पालकमंत्री सत्तेज पाटील यांनी व्यक्त केला आहे . दोन्ही नेत्यांनी किंवा आघाड्यांना आपापल्या ठरावदारांवर ठाम विश्वास दाखवला आहे . प्रत्येक ठरावदार हा आपल्यासोबतच आहे , अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतला आहे . त्यामुळे आजपासून प्रसार माध्यमांमध्ये कल कोणाचा असा विचारणा करणारे फोन खणखणू लागले होते . प्रत्येक कार्यकर्ता आपआपल्या नेत्यांच्या कार्यालयात काय होणार आणि कसे होणार , याची गणित मांडत बसले आहेत .