पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली, असंही ते म्हणाले.
या आगीमागे घातपात होता की अपघात होता, हे आताच सांगता येणार नाही. तसं बोलणंही योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही ते म्हणाले. या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.