नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची मोठी घोषणा आज केंद्रीय निवडणुक आयोगाकडून करण्यात आली आहे. एकूण ५३२ लोकसभा मतदारसंघापैकी १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याची अधिसुचना २० मार्च रोजी निघणार आहे. तसेच अर्ज सादर करण्याची तारीख ही २७ मार्च असून ३० मार्चला उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. एकूण सात टप्प्यात निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मतदान हे १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर ४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती आज निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे.
लोकसभा निवडणुकांबरोबर काही राज्यात विधानसभांच्याही निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये सिक्किम, ओडीसा, अरूणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यात विधानसभांचीही निवडणुका होणार आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये १६ मार्चला निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ओडीसा राज्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच याची मतमोजणी ही ४ जून रोजी संपुर्ण देशात होणार आहे.
संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्पा हा १९ एप्रिल असणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे सातवा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ९६.८ कोटी लोक मतदान करणार आहेत. यामध्ये ४९.७ कोटी पुरूष, ४७.१ कोटी महिला तर १९.७४ कोटी तरूण मतदान प्रक्रियात भाग घेणार आहेत. यातच यावेळी जवळपास १.८ कोटी पहिल्यांदाच तरूण मुलं मुली मतदान करणार आहेत. तर जवळपास ८२ लाख मत हे ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक मतदान करणार आहेत. तर देशात साडेदहा लाख पोलिंग बुथ तयार आहेत. महिलांसह तरूण मतदार वर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, २०१९ साली संपुर्ण भारतात एकूण सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. तर त्याची मतमोजणी ही मे महिन्यात करण्यात आली होती. त्यावेळी भाजपने बहुमताचा आकडा गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत आता इंडिया आघाडी की एनडीए आघाडी सरकार स्थापन करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.