मुंबई : 2019 साली राज्यात आदित्याला मुख्यमंत्री करतो आणि मी केंद्रात जातो, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. यातच अर्थखाते रस असून त्यातील माहिती आहे, त्यामुळे केंद्रात गृहखातं घेणार असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. त्यावर आता भाजपकडून सडकून टिका केली जात आहे.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात. अशी जहरी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.
देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं. याला कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की. असा इशारा देखील बावनकुळेंनी दिलाय.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री होते. तेव्हा आदित्यने विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस मला म्हणाले की, आदित्यला मी चांगला तयार करतो. अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. मी त्यावेळीच त्यांचा विरोध केला होता. आदित्य लहान आहे. त्याच्या डोक्यात हे घालू नका. असे सांगितले होते. पण आदित्यला जर मुख्यमंत्री केले, तर तुम्ही इतके ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम कसे करणार? असा प्रश्न मी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षानंतर मी दिल्लीत जाणार. मला अर्थखात्यातले जरा कळते. “याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थखाते पाहण्यात रस होता”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.