शिवसेनेतील सत्ता संघर्षावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अपात्रतेच निर्णय लवकर घेण्याची नार्वेकर यांच्याकडे मागणी केली जात आहे. आता राहुल नार्वेकर यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना नार्वेकर यांनी मोठे भाष्य करून खळबळ उडवून दिली आहे. देसाई यांच्या ‘दौलत’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेल्या भाषणात न्यायालयाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर नार्वेकर यांनी महत्वाचे भाष्य केलं आहे. “मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन” असं ते म्हणाले. त्यामुळे आमदारांच्या पात्रतेवर लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार”, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.