कोलकत्ता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. गेल्या वर्षभरापासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर या निवडणुकीच्या निकाल आता समोर येत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे. ममता यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे
दरम्यान, संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती ममता बॅनर्जी यांची झाली आहे.