पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी विभागातील योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनेन पीक उत्पादनाचे नियोजन करावे. राज्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजेत. त्याचबरोबर विभागवार पिकांचेदेखील नियोजन करून ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाचीदेखील या प्रकल्पास जोडणी करावी जेणेकरून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल. बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली