मुंबई : दिल्लीच्या सीमेवर मागील 7 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. पंजाब-हरियाणातून आलेले शेतकरी नवीन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी करत आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसने देखील दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थानार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडेल.
भाजप सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उद्या ३ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा! pic.twitter.com/fBVXtbkl41
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 2, 2020
जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालय येथे हे आंदोलन होणार आहे. कोविडच्या नियमांचे पालन करुन आंदोलन करावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काल केंद्र सरकारच्या वतीनं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पण या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही.