मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वेगाने जागतिक महामारीच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येयमुळे, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन, तसेच या महामारीशी संबंधित इतर यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे. दरम्यान, जागतिक महामारीच्या या साथीत लसीकरणावर भर दिला जात असला, तरी लसींचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राज्यातला ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने विविध राज्यांशी संपर्क साधला असून, तिथून अधिक ऑक्सिजनची आयात ठाकरे सरकार करणार आहे, तर रेमडेसिवीरसाठी सरकारनं थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी काही देशांच्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भात राज्य सरकारने जाहिराती दिल्या आहेत.
दरम्यान, या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून सिंगापूर, बांग्लादेश, इजिप्त अशा काही देशांनी राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता या परदेशी उत्पादकांकडून रेमडेसिवीरची खरेदी करता येते का, यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रेमेडीसीवर आणि ऑक्सिजनच्या राज्याला होणाऱ्या अपुऱ्या पुरवठ्यावरून, राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले होते. त्यामुळे एकीकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र होते तर दुसरीकडे केंद्र-राज्य आणि राज्य-राज्य अशी खडाजंगी पाहायला मिळत होती. याच दरम्यान राज्यात, रेमडेसिवीरचा काळाबाजरही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळं रुग्णांचे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.