सिंधुदुर्ग – राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून काही ठिकाणाचे निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपा आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे.
आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झालीय. कणकवली हा आमदार नितेश राणेंचा गड मानला जातो त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कणकवलीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेलं राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात.
ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये होईल. एकू ण १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. १५२३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात २६,१७८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकू ण ४६,९२१ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.