मुंबई – सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही. राज्यपाल आज सकाळी 10 वाजता मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी 122 बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते.
मुंबईतून ते प्रथम राज्य शासनाच्या चार्टर विमानाने देहराडून येथे जाणार होते. त्यासाठी ते विमानतळावर गेल्यावर उड्डाण घेण्याचे परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्सपाल यांनी चार्टर विमानाऐवजी रेग्युलर फ्लाईटने देहरादून येथे गेले. राज्य शासनाने चार्टर फ्लाईट पूर्व नियोजित उपलब्ध करून द्यावे, असे राजभवनाकडून सांगण्यात आले होते. ते उपलब्ध का करून दिले गेले नाही याची माहिती तुर्तास उपलब्ध झालेली नाही.
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधीदरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलं होतं
तर ’12 आमदारांच्या मुद्यावर जो काही कायदेशीर निर्णय असेल, तो राज्यपाल घेतील. निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. त्यांचा निर्णय जर योग्य नसेल तर महाविकास आघाडी सरकारला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते घेतील’ अस पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.