मुंबई :राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य सुरळीत सुरु असल्याचे दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यास मिळाले आहे. सहापैकी चार ठिकाणी या सरकारला यश मिळाल्याने सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील एकत्र लढवण्यावरून चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात तिन्ही पक्षांमध्ये अजूनही एकमत झालेले नसून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयी मोठे विधान केले आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ही बातमी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे काही आदेश येतील त्यानुसार आम्ही स्थानिक पातळीवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई महापालिकेची निवडणूक देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आगामी काळात राज्यभरात विविध ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी देखील हा नियम पाळणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षातील कार्यकर्ते कसे एकत्र लढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.