मुंबई : मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे एक महिन्याच्या आत मागे घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याबाबतचाही शासन निर्णय काढण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होती.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेतला होता. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरू असून त्यावर एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय काढला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. यात फक्त २६ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
नोकरीबाबतही निर्णय
मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही शासन निर्णय काढण्यात आला आहे. ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्यांच्या वारसाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. महामंडळाकडे नोकरीचे प्रस्ताव आल्यावर त्यावर एका महिन्याच्या आत नोकरीवर घेण्याबाबत कार्यवाही करावी,’ असे आदेशात म्हटले आहे.
Read Also :
धनगर समाजाचं आरक्षण आणि आर्थिक विकासाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री https://t.co/UEfIxZo2R1
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 11, 2020