अहमदनगर : राज्य सरकारने नुकतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना सुरु केली आहे. मात्र माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून सरकारच्या या योजनेचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. नगरमध्ये आले असता वैभव पिचड यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेवर भाष्य करताना सरकारवर निशाणा साधला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. मात्र, ही मोहीम चालवताना करोना ही आमची जबाबदारी राहिलीच नाही, असेच राज्य सरकारला कदाचित सांगायचे आहे असा घणाघाती आरोप पिचड यांनी यावेळी सरकारवर केला.
‘करोना जेव्हा सुरू झाला, तेव्हा सर्वात प्रथम त्याची जबाबदारी ग्रामीण भागात गावातील सरपंच म्हणजेच करोना समितीवर टाकण्यात आली. या समितीसाठी मात्र राज्य सरकारने एकही रुपयांची तरतूद केली नाही. जो काही खर्च झाला, तो ग्रामपंचायतींना स्वतःच्या उत्पनातून करावा लागला. तसेच आता जी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू झाली, त्यात सुद्धा सरकारने सांगितले आहे की ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी दोन कर्मचारी नियुक्त करून त्यांचा हजार-हजार रुपये पगार हा ग्रामपंचायतीने द्यावा.
पण या सर्वेक्षण कामासाठी ग्रामपंचायतीने उत्पन्न आणायचे कुठून ? गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये आर्थिक चणचण सुरू आहे. ग्रामपंचायत कर्मचारी-पदाधिकारी वसुलीला गेले, तर त्यांचे लोकांसोबत भांडण होत आहे. करोना सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना पैसे टाकायला सांगणं योग्य नसल्याचे पिचड म्हणाले. ‘ही मोहीम म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठामपणे सांगितले आहे की, करोना ही आमची जबाबदारी राहिलीच नाही. तुम्हीच तुमचे आरोग्य सांभाळा व तुम्हीच तुमचे कुटुंब सांभाळा, या पद्धतीची सरकारची भूमिका दिसतेय, असा गंभीर आरोप पिचड यांनी यावेळी केला.
Read Also
संतापजनक ! भाजप मंत्र्याने गाडीलाच लावला उलटा तिरंगाhttps://t.co/bUCgxjiPow#BJP #Tiranga
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020