कोलकाता : पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र यात सर्वाधिक लक्ष्य पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे आहे. ममता बॅनर्जींचा गड असलेल्या बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 30 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या तीन आमदारांवरून थेट बहुमत मिळवणे भाजपसाठी अवघड आहे.
अनेक ऑपिनियन पोल्समध्ये ममता बॅनर्जी आपला गड कायम राखताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी आपला नेहमीचा मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून आपली उमेदवारी जाहीर केली. मात्र मतदारसंघात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप ममता बॅनर्जींना केला आहे. ममता बॅनर्जींवरील हल्ल्यामुळे यातून सहानभुती निर्माण होऊन निवडणुकीत विजय मिळविण्यात त्यांना यश मिळेल का ? ज्या प्रमाणे शरद पवारांच्या पावसातील सभेने निवडणुकीच्या निकालांवर परिणाम केला होता, तसाच परिणाम या हल्ल्यामुळे होईल का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजपमध्ये ताटातूट झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन करण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची होती. मात्र या सर्व घडामोडींमध्ये देखील एका गोष्टीची अधिक चर्चा झाली ती म्हणजे शरद पवारांच्या पावसातील सभेची.
शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या सभेने निवडणुकीत विजय मिळविण्यात राष्ट्रवादीला मोठी मदत केली. त्यावेळी त्यावेळी त्यांच्या पायालादेखील दुखापत झाली होती. त्यावेळी बँडेज लावण्यात आलेल्या पवारांच्या पायांचा फोटो व्हायरल झाला होता. साताऱ्यात 18 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अचानक पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. मात्र शरद पवारांनी त्याही परिस्थितीमध्ये भाषण सुरूच ठेवले. याचा परिणाम निवडणुकांच्या निकालावर पाहायला मिळाला. आता ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून देण्यास मदत करेल ?
ममता बॅनर्जींचे देखील हॉस्पिटलमधील बेडवरील पायाला प्लास्टर असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढील काही दिवस त्या व्हिलचेअरवरून राज्यभर प्रचार करणार आहेत.
शरद पवार आणि ममता बॅनर्जींमधील आणखी एक साम्य म्हणजे निवडणुकीच्या आधी अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पश्चिम बंगालमध्ये देखील तेच पाहायला मिळत आहे. जवळपास तृणमूल काँग्रेसच्या 30 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममतांचे जवळचे सहकारी सुवेंदु अधिकारींनी देखील भाजपात प्रवेश केला.
ज्याप्रमाणे पवारांच्या पावसातील सभेने बाजी पलटली, तसाच परिणाम ममता बॅनर्जींवरील हल्ल्याने बंगालमध्ये होणार की भाजप सत्तेत येणार ?, हे 2 मे लाच कळेल.