मुंबई : लॉकडाऊनच्या काळात विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे. कोरोनाग्रस्तांची वाढते आकडेवारी, मंदिरे उघडण्याची मागणी, हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची मागणी अशा विविध मुद्यांवरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. यात प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आघाडीवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी सध्या मागण्या घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळाची गर्दी वाढत आहे.
जिम मालक-चालकांपासून मंदिरे उघडण्यासाठी ते थालय आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत आपले प्रश्न मांडत आहेत. ग्रंथालय सुरू करण्याविषयी राज ठाकरे यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मोबाइलद्वारे चर्चा केली असता लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
राज ठाकरे देखील त्यांच्या भेटीला येणाऱ्या शिष्ठमंडळाचे म्हणणे ऐकत आहेत व सरकारकडे त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र पाठवत आहे. मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासाठी देखील मनसेकडून जोरदार मागणी केली.
भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असताना राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर होणाऱ्या गर्दीची सध्या विशेष चर्चा आहे.