मुंबई : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून, राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. त्यामुळे हा मराठा समाजासोबतच राज्य सरकारसाठी खूप मोठा धक्का आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. “राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाजूनं ठाम भूमिका मांडली असली तरी योग्य रणनिती आखली गेली नाही”, असा आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
यावेळी, आजचा दिवस मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आहे. मराठा तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी”, असं विधान देखील विनोद पाटील यांनी केलं आहे.
तसेच, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं आहे. यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मराठा तरुणांच्या चिता आजही आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. त्यांच्या मागणीला कोण पूर्ण करणार? मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण यातून मिळणार होतं ते आता कोण देणार? याचं उत्तर आता राज्य सरकारनं द्यायला हवं”, असं म्हणत त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली.