पुणे : महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला जणू संकाटकाळाचे लक्ष राहिलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात लोकांना काळजी घेण्यासाठी वेळोवेळी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी बैठका घेणार नाही असं सुचवलं असतानाही आता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने बैठकांचे सत्र सुरु केल्याने आता चर्चा सुरु झाल्या आहेत. कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेतात. मास्क न परिधान करणाऱ्यांना झापतात.
मीडियाचे बूम देखील सॅनिटाइझ करतात. राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच पक्षाला त्याचा विसर पडला आहे. राजकीय बैठका घेण्यास मनाई असताना नियमाचे उल्लंघन करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली. या बैठकीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता.
अनलॉक पाचमध्येही राजकीय बैठका घेण्यास परवानगी नाही. कोरोना कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेत आहेत. मास्क, हातमोजे सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीतही ते काळजी घेतात. अधिकाऱ्यांनाही सूचना देतात. माध्यमांना प्रतिक्रिया देताना मीडियाचे बूम देखील सॅनिटाइझ करतात. सुरक्षित अंतर न पाळल्यास वेळप्रसंगी झापतात. जवळ येत बोलू लागताच त्यांनी मनसेच्या नगरसेवकाला झापले होते. अजितदादा एवढे पाळत असताना त्यांच्या पक्षाला, नगरसेवकांना मात्र याचा विसर पडला आहे.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आकुर्डीत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती . सुरक्षित अंतराचे कसलेही पालन झाले नाही. कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे.तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.
बैठका घेवू नका म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच राजकीय बैठका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता अजितदादा काय भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या 80 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत आहे.
दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमुखी नेतृत्व राहिले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. भारतीय जनता पक्षाकडे पक्षाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला उध्वस्त केला . शहरात सर्वांगीण विकास करूनही, अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार नाराज आहेत. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्यावर सोपविणार का, याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.
Read Also :
राष्ट्रवादी आगामी पिंपरी चिंचवड निवडणुकीची धुरा अमोल कोल्हेंकडे देणार? https://t.co/USo6KoODgI @NCPspeaks @AjitPawarSpeaks @kolhe_amol @amolmitkari22
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020