मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे प्रकरण आत्म्हत्येचेच असल्याचे एम्सच्या विशेष पथकाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र, मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेनेसह अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ‘हे तर मुंबईला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते. खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे’, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मराठी वृत्तवाहिनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
‘स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र, आता खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल यामुळे आता लोकांचा मनपावरचा विश्वास वाढला आहे’, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘यंत्रणांनी काय समोर आणले ते पाहा. हे मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. आमचा यंत्रणांवर विश्वास आहे. मात्र, यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आता प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात खाली राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाज माध्यमांतून त्यांना चागले उत्तर दिले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका
यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीवरदेखील भाष्य केले. ‘रेल्वे इतक्यात सुरू व्हायला नको, काही पक्ष यावर राजकारण करत आहेत. कोरोना हा गंभीर आजार असून, 10 पैकी 4 जण रोज दगावतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे रेल्वे सेवा हळूहळू सुरू करणे योग्य राहील. अति घाई संकटात नेईल, हे लोकांना कळायला हवे. मुख्यमंत्री मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करतात, मृत्यूचा नाही!’, असे त्या म्हणाल्या. कोरोनाला हलक्यात घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे.
सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.
Read Also :
हाथरस प्रकरणाच्या चौकशीनंतरच त्यावर बोलणं योग्य होईल: रावसाहेब दानवे https://t.co/e6RFQrQyeS @raosahebdanve @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020