कोरोनामुळे सरकारने देशव्यापी लॉकडाऊन केले होते. अनलॉकच्या प्रक्रियेंतर्गत काही गोष्टींना सूट देण्यात आलेली आहे. मात्र काही राज्यांमध्ये आताही लोकांच्या प्रवासास व सामानांच्या वाहतुकीस बंदी आहे. यावरून केंद्राने राज्यांना आता पुन्हा एकदा निर्देश दिले आहेत.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांतर्गत आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात राज्यांना पत्र लिहून निर्देश दिले आहे. अजय भल्ला यांनी म्हटले की, विविध जिल्हे आणि राज्यांकडून स्थानित पातळीवर दळणवळणावर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. अशा बंधनांमुळे माल आणि सेवांच्या आंतरराज्यीय दळणवळणामध्ये अडथळे येत आहेत. तसेच यामुळे पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
अजय भल्ला पत्रात म्हणाले की, केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉक-३ च्या नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको. विस्कळीत व्यवहारांचा परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे
शेजारील देशांशी झालेल्या करारांतर्गत सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वेगळी परवानगी, मान्यता किंवा ई परमिटची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांना अनलॉक-3 च्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करत सांगितले.
दरम्यान, केंद्राच्या निर्देशानंतरही महाराष्ट्र सरकार निर्णय घेईपर्यंत जिल्हाबंदी सुरूच राहणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी बसमधून विना ई-पास प्रवास करता येईल. मात्र खाजगी वाहनांसाठी ई-पास आवश्यक आहे, असे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.