मुंबई : पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे.
“मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली,” असं ते म्हणाले. “माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असं सांगितलं होतं. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असंही सांगितलं होतं.
ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचं विभाजन करायचं असेल तर हरकत नाही असं स्पष्ट केलं होतं. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगितली होती. पण अचानक हा मुद्दा का आला याची मला कल्पना नाही. पण जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
दिल्लीतील नेत्यांसोबत राजीनाम्याची चर्चा झाली का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, “दिल्लीत जाऊन मी राजीनाम्याची चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामध्ये इतरांना जबाबदारी वाटून द्यावी अशी भूमिका कोणी मांडत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. त्यातच यासंबंधी प्रक्रिया सुरु झाली असेल तर मी स्वागत करतो. मी समाधानी, आंनंदी आहे. मला काही अडचण नाही”.
राजीनामा दिल्यास प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी कोणाचं नाव पुढे करणार नाही. निर्णय घेताना एकच अपेक्षा असेल की तरुण, धडाडी, काँग्रेसला पुढे नेईल आणि राज्यभर फिरेल अशा कोणत्याही योग्य व्यक्तीला संधी दिली जावी”. एच के पाटील यांच्या कामावर आपण समाधानी असल्याचं सांगत त्यांनी नाराजीचं वृत्तही फेटाळलं.
Read Also :
‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी