भारतीय जनता पक्षाच्या वतीने विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर जोरदार टीकेबाजी केली.
उर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील तरीही शेतकऱ्यांना विज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर यावे लागते. मोफत विज देण्याची घोषणा झाली. उपमुख्यमंत्री असा निर्णय झाल्याचे सांगतात. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चालते ते समजत नाही. पदांसाठी सतत संघर्ष करून दमलेल्या महाविकास आघाडी सरकारकडे जनतेच्या कामासाठी उर्जा शिल्लकच राहिली नाही, अशी टीका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विखे पाटील म्हणाले, की कोरोना काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. पण या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिल पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची करण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलने झाली. बहुतेक ठिकाणी वीज वितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून सरकारचा निषेध करण्यात आला.