सोलापूर: उजनी धरणाच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकारण पेटले आहे. उजनी धरणातील थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही. पाणी पळविल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राज्यमंत्री, आमदारकीच नव्हे तर राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विरोधकांनी चुकीची माहिती पसरवून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियोजन भवनात कोरोनाची बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते. उजनी धरणातील पाण्याचे वाटप यापूर्वीच निश्चित झाले आहे.त्यामुळे त्यात आता कोणताच बदल होणार नाही. आपली भूक भागविण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातील भाकर हिसकवण्याचे संस्कार आपल्यावर झाले नसल्याचे भरणे यांनी यावेळी म्हटले आहे.
राज्य सरकारकडून सोलापूर जिल्ह्यासाठी मदत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.जिल्ह्यातील कोणताही रुग्ण इंजेक्शन किंवा ऑक्सिजनच्या कारणाने दगवणार नाही याची खबरदारी आपण घेत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. दोन दिवसांपासून भरणे यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर टीका चालू आहे.
उजनीचे पाणी पेटले – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उजनी जलाशयात बुडवून निषेध
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेले असून, या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील स्वाक्षरी झालेली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफळून आला होता. पालकमंत्री भरणे यांच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांनी उजनी धरणात शनिवारी आंदोलन करीत तसेच दत्तात्रय भरणे यांना सोलापूरचा पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया’ सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उजनी जलाशयात बुडवून निषेध केला होता. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा पवित्र या वेळी घेण्यात आला होता. यावेळी महिलांनी आमच्या हक्काचं पाणी का चोरलं ओ, अशा ओव्या गाऊन रडारडी केली.