गडचिरोली- लॉकडाउन उठविण्याविषयी घोषणा करून राज्यात गोंधळाची परिस्थीती निर्माण करणारे मंत्री विजय वडेट्टीवार त्या आधीच सुद्धा एक गोंधळ निर्माण केला आहे. चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठविण्यासाठी समिती नेमण्याची जाहीर सूचना २९ मे रोजी गडचिरोलीत करून त्यांनी दारूबंदी, आदिवासी व स्त्रियांचे हित आणि राज्य सरकारची भूमिका, या विषयी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय व गोंधळ निर्माण केला आहे.
मंत्री वडेट्टीवारांचा हा गोंधळ अजाणता घडलेला नाही. त्यांना चंद्रपूरला वार्षिक एक हजार कोटींचा व गडचिरोलीत पाचशे कोटींचा दारू व्यापार उभारायचा आहे. त्यामुळे त्यांचा हा गोंधळ त्वरित निस्तरावा, अशी मागणी महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रातून केली आहे.
मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रात डॉ. बंग यांनी म्हटले आहे, गडचिरोली जिल्ह्यात १९९३ साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना लागू केलेली दारूबंदी आहे. येथील दारूबंदी ही केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ला अनुसरून आहे. ‘दारू-तंबाखू नियंत्रण राज्यस्तरीय टास्क फोर्स’अंतर्गत गडचिरोलीत जिल्हाव्यापी दारू-तंबाखू नियंत्रणाचा प्रयोग सुरू आहे.