मुंबई : मावळ तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपुर्ण विषयांबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मंत्रालयात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही भर देण्याचा उद्देश आहे.
लोहगड-विसापूर ते एकविरा पायथा या रस्त्याचे काम सुरू व्हावे. तसेच एकवीरा देवी मंदिर परिसर पर्यटकांना प्रसन्न वाटेल अशा प्रकारे सुशोभित करणे गरजेचे आहे. या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, असे निवेदन आमदार शेळके यांनी दिली. ही कामे लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.
कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद होती. लॉकडाऊन, कोरोना यामुळे पर्यटन क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्यटनासारख्या उद्योगाचे नुकसान या संकटामुळे झाले आहे. सद्यस्थितीत मागील काही दिवसांपासून अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही भर देता येईल, त्यासाठी देखील प्रयत्न करता येईल असे आश्वासन त्यांनी दिले.