बीड : ऊसतोडणी कामगारांच्या घामावर आणि रक्तावर स्वतःचे इमले बांधणाऱ्या साखर कारखानदारांची वार्षिक उलाढाल 80 हजार कोटी रुपयांची आहे. मात्र ज्यांच्या जिवावर मजा मारतात त्या कामगारांना आणि मुकादमांना त्यातील किती रक्कम मिळते याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे, भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. कारखान्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
ऊसतोड मजूर आणि मुकादम संघटनेच्या संयुक्त चर्चासत्रात बोलताना सुरेश धस म्हणाले की, मजूरी दरामध्ये 150 टक्क्यांनी वाढ झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नका. यावर सर्व संघटनांनी एकत्र यावे.
धस म्हणाले की, साखर संघ आणि ऊस तोडणी कामगारांना लवादा रुपाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी न्याय दिला. त्यांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्र शासन आणि साखर कारखानदारांची यूती असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. गृहविभागाचा वापर करून कितीही संप मोडीत काढण्याचा वापर केला तरीही सर्वजण मिळून आंदोलन यशस्वी करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.