बीड : ऊसतोड कामगारांचा लवाद हा कामगाराची बाजू घेत नाही तर कामगाराच्या नावावर कारखान्याची बाजू घेत आहे. कामगारांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा कारखान्याच्या प्रश्नावर बोलणारे इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. फक्त आणि फक्त स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत होते. आता मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली देत कामगारांकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने आता स्वत: गोपीनाथराव मुंडे व्हावं, अन् अन्यायाविरूद्ध उभे राहावे असे आवाहन, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले आहे. ते मांजरसुंबा येथे आयोजित ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात केले.
विनायक मेटे म्हणाले की, ऊसतोड कामगारांबाबतचा जो लवाद आहे तो लवाद फसवा आहे. तो कामगारांसाठी नाही तर कारखानदारांसाठी आहे, 17 नोव्हेंबर 2015 रोजी झालेला करार वाचून दाखवत या करारामध्ये ऊसतोड कामगारांसाठी काहीच नाही तर कारखानदारांसाठीच सर्व काही आहे.
गोपीनाथराव मुंडे हे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर लढायचे, भांडायचे परंतू आताचे स्वत:ला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणणारे, ऊसतोड कामगारांच्या नावावर कारखान्याचं हित पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने स्वत: गोपीनाथ मुंडे होवून आपल्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला हवा. काहीजण म्हणतात आ. मेटेंचा आणि ऊसतोड कामगारांचा संबंध काय? मी म्हणतो मुंबई राहणार्यांचा आणि ऊसतोड कामगारांचा संबंध काय? मी तर या मातीत जन्मलो, ऊसतोड कामगारांसोबत लहाणाचा मोठा झालो, त्यामुळे यापुढे ऊसतोड कामगारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, त्यामुळे मी कोणाच्याही अंगावर जायला तयार असल्याचेही ते म्हणाले.
मेटे म्हणाले की, सध्या सुरेश धस या प्रश्नावर बोलताना दिसून येतात. माझ्या ऐकीव माहितीनुसार त्यांना त्यांच्या तालुक्यापुरतीच जबाबदारी दिली होती परंतू ते महाराष्ट्रभर कोणाच्या आदेशाने फिरतात हे मला माहित नाही. आ. सुरेश धस यांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन करून ऊसतोड कामगारांचा धर्म आणि जात ही कामगारच आहे. त्यामुळे कामगारांच्या कष्टाला त्यांच्या अधिकाराला, मोबदला मिळालाच पाहिजे.