नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मनसे शहराध्यक्ष सुनील ईरावार यांच्या आत्महत्येने कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ईरावार यांनी 15 ऑगस्टला रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत, असे सांगत त्यांनी आत्महत्या केली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला. राज ठाकरे यांनी सुनील यांचे भाऊ अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले.
काय झाला संवाद?
राज ठाकरे : हॅलो
अनिल ईरावार : हॅलो, अनिल बोलतोय
राज ठाकरे : जय महाराष्ट्र, राज ठाकरे बोलतोय
अनिल ईरावार : जय महाराष्ट्र साहेब, साहेब तुमचा वाघ गेला… खूप प्रेम करायचा तुमच्यावर…
राज ठाकरे : पण काय झालं त्याला अचानक?
अनिल ईरावार : हसत-खेळत होता, काहीच कल्पना नाही, घरी भांडण नाही
राज ठाकरे : मग काय झालं त्याला?
अनिल ईरावार : अचानकच, कोणतं टेन्शन होतं काय माहिती
राज ठाकरे : कसलं टेन्शन? माझ्याशी बोलायचं तरी.
अनिल ईरावार : मला खूप वेळा बोलला, साहेबांना भेटलो माझी किस्मत मोठी आहे, खूप भाग्यवान आहे.
राज ठाकरे : घरी कोण कोण असतं?
अनिल ईरावार : आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहतो, चार भाऊ, वहिनी, आताच एन्गेजमेंट झाली होती.
राज ठाकरे : काही दिवसांनी मी स्वत: घरी येईन भेटायला, काळजी घ्या.
"अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं…" महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर ह्यांच्या आत्महत्येनंतर मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरेंचं भावनिक आवाहन. #महाराष्ट्रसैनिक #संघर्षयोद्धा https://t.co/kpeU7fNYZ4
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 17, 2020
दरम्यान, या घटनेनंतर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र देखील लिहिले. ‘अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचे आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं’, असे ते म्हणाले.