सोलापूर : कोरोनाच्या संकटात आर्थिक कोंडीत सापडलेल्या महिलांची कर्जे त्वरित माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपुरात मोर्चा काढण्यात आला आहे. कोरोना काळात उद्योग व्यवसाय बंद पडले, राज्यातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे तरी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी घेतलेले कर्ज त्वरीत माफ करावे, अशी मागणी मनसेकडून केली जात आहे.
मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली बचत गटांच्या शेकडो महिला सदस्यांनी शिवाजी चौकातून पंढरपूर तहसील कार्यालयावर हा विराट मोर्चा काढला. पंढरपूरच्या तहसीलदारांना कर्जमाफी संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि हा मोर्चा समाप्त करण्यात आला.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महिला बचतगटांचा व्यवसाय ठप्प आहे त्यामुळे त्यांना व्यवसाय कर्ज फेडणं अशक्य झालं आहे. ह्याचा सरकारने सहनभूतिपूर्वक विचार करावा आणि ही कर्ज माफ करावी ह्या मागणीसाठी सरचिटणीस श्री.दिलीप धोत्रे ह्यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे विशाल मोर्चा काढण्यात आला. pic.twitter.com/BNuOuhvMcz
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2020
महिला बचत गट सदस्य असलेल्या अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेतली मात्र नंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांचा या पैशातून खरेदी केलेला माल खराब झाला व मोठा आर्थिक फटका बसला. मोठं आर्थिक संकट कोसळलं असून मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावी, अशी मागणी महिलांची आहे.
मायक्रो फायनान्स कंपनीना विम्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी आदेश द्यावे आणि संपूर्ण वसुली थांबवावी ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.