मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.
9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील, असेही नांदगावकरांनी सांगितले. याशिवाय, निवडणुका जवळ आल्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे काय आहे कारण?
23 जानेवारी 2020 रोजी मनसेने आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरली. पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचं समजतं. बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत.
भाजप आणि मनसे एकत्र येणार का? अशीही चर्चा रंगली होती. मनसेने उत्तर भारतीयविरोधी भूमिका सौम्य केली तर आम्ही विचार करुन असं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून मिळत होतं. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे. राज ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला तर ते उत्तर भारतीयांजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा होऊ शकते.