मुंबई : सध्या देशभरात करोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. एका दिवसाला देशात करोनाचे दीड लाखांहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. सध्या देशात महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे.
या राज्यांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.
दरम्यान, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय की, देशात करोनाच्या आलेल्या पहिल्या साथीपासून आत्तापर्यंत, राज्यातच सर्वाधिक रुग्ण सापडले असून, दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. आता परत आलेलली ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते दूरगामी उपायही नव्हेत; पण जर पुरेशा लसीच मिळत नसतील, तर पर्याय तरी काय उरतो? असा त्यांनी सवाल विचारला आहे.
तसेच राज्यातील करोनाच्या प्रादुर्भावाला कमी करायचे असेल, तर राज्यातील जनतेचे १००% लसीकरण करणेच उचित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात १००% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करायलं हवे आणि आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी, या सूचनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहाल आणि प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नव्हे; तर खात्रीच आहे, असा विश्वास पत्रात व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या :-
- महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या.
- राज्यातील खासगी संस्थानांही लसी खरेदी करता याव्यात.
- सीरम इन्स्टिटयूटला महाराष्ट्रात संपूर्णपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
- महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून, लस उत्पादनाची मुभा द्यावी.
- राज्याला आवश्यक त्या उपाययोजना आणि त्या दृष्टितने पाऊलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.