मुंबई : राज्यात करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीकडे लक्ष राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळी मणसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला. कुणाला कधी कोरोना होईल हे ब्रम्हदेव हि सांगू शकत नाही, असे सांगत संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे
लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा नसल्यानं एसटी व इतर वाहनांमधून नागरिकांची परवड होत असल्याचं चित्र आहे. याकडे मनसेनं लक्ष वेधत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याची मागणी केली होती. “लॉकडाउनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सरकारला विनंती केली परंतु ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,”असं देशपांडे म्हणाले होते.