मुंबई : राज्यात अनलॉक प्रक्रियेंतर्गत एकएक गोष्ट सुरू केली जात आहे. मात्र अद्याप शाळा-कॉलेज, मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मंदिर खुली करण्यासाठी भाजप, वंचित बहुजन आघाडी आंदोलन करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या मागणीचा पाठपुरावा केला आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
"पहले मंदिर फिर सरकार" "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक" म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 4, 2020
संदीप देशपांडे यांनी ट्विट केले की, पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?
याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मंदिर खुली करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात म्हटले होते की, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल.