दोन दिवसांपासून मुंबईत सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री तब्बल 9 तास पावसाने शहराला चांगलच झोडपून काढले. यामुळे रेल्वे सेवा, बस सेवांवर देखील परिणाम झाला. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते. कोव्हिडच्या रुग्णांसाठी असलेल्या नायर रुग्णालयात देखील पाणी शिरले होते.
दरवर्षी पावसामुळे होणाऱ्या या स्थितीमुळे मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहेत. भाजप पाठोपाठ आता मनसेने देखील शिवसेनेवर तोफ डागली असून, कुठलीच सेवा देणार नसेल तर टॅक्स का भरायचा ?, असा सवाल मनसेने विचारला आहे.
रस्त्यात खड्डे, पावसाळ्यात घरात पाणी,कचऱ्याच साम्राज्य, मनपा शाळेचा बोजवारा, रुग्णालयाची दुरवस्था कुठलीच सेवा देणार नसाल तर टॅक्स का भरायचा?तुमचे खिसे भरायला?की मनपा च्या F. D वाढवयाला?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 25, 2020
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले की, रस्त्यात खड्डे, पावसाळ्यात घरात पाणी, कचऱ्याच साम्राज्य, मनपा शाळेचा बोजवारा, रुग्णालयाची दुरवस्था. कुठलीच सेवा देणार नसाल तर टॅक्स का भरायचा? तुमचे खिसे भरायला? की मनपाच्या एफडी वाढवयाला?
याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील, कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील का नाही ? असा सवाल शिवसेनेला केला होता.