मुंबई : मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं हलवण्याचा राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाला भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहे व कांजुरमार्गला कारशेड हलवल्याने 4000 कोटी अतिरिक्त खर्च येईल, असे म्हटले आहे. आता कांजुरमार्गच्या नवीन जागेचा तिढा देखील अद्याप सुटलेला नसून, ही जनतीची गैरसोय असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करून मेट्रो कारशेडच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. ‘मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती’ असा खुलासा केला आहे.
‘कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो सुरू होण्यासाठी ४ ते ५ वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर २०२१ मध्ये कार्यान्वित होणार होती. शिवाय, कांजुरमार्ग येथील जमिनीची सद्यस्थिती पाहता कंत्राट दिल्यानंतर, त्या जागेचे स्थिरीकरण, इत्यादीसाठी २ वर्ष कालावधी लागणार. कारडेपो कांजुरमार्ग येथे स्थलांतरित करून मेट्रो-३चे प्रश्न तर सुटणार नाहीच, शिवाय मेट्रो ३ आणि ६ अशा दोन्ही मेट्रोच्या फेर्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत,’ असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
‘2015 मध्ये आमच्या सरकारने कांजुरमार्ग येथील पर्याय विचारात घेतला होता. तथापि, त्यासाठी लागणारा विलंब आणि जमिनीसंदर्भातील विविध कायदेशीर अडचणींमुळे या पर्यायावर विचार थांबविण्यात आला. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या 17 जानेवारी 2020 च्या स्थळपाहणी अहवालावरून असे लक्षात येते की, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागा अद्यापही विवादित आहे’ असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एवढेच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई जिल्हाधिकार्यांनी कांजुरमार्गची जागा हस्तांतरित करताना ही अट स्पष्टपणे नमूद केली आहे की, या जागेशी संबंधित दावे प्रलंबित असल्यास त्यावरील खर्च हा ‘एमएमआरडीए’लाच सोसावा लागणार आहे. त्यांनी पुरावे म्हणून कागदपत्रे देखील सादर केली आहेत.