बीड : मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्षा असलेल्या वैद्यनाथ कारखान्याचाही समावेश आहे. मात्र परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यालाही 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहामी मिळाली आहे. या थकहामीवरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
आपल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने थकहमी मंजूर केली असून, यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
तर, परळी तालुका आणि परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून कारखाना सुरू होऊन सर्व उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या व अनेक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कारखाना या विषयात राजकारण आणणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे.