अहमदनगर : नगर-मनमाड रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या महामार्गाची अवस्था अतिशय भीषण झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील याबाबत म्हणाले की, नगर-मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या खड्ड्याकडे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
याबाबतची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांना दिली असल्याचे देखील विखे पाटील यांनी सांगितले. सोबतच नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी आपण विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र दिले आहे. पण रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आता कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.