गेल्या चार निवडणुकांपासून आपण सतत महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केली. विशेष म्हणजे जोशी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच हा निर्णय जाहीर केल्याने कार्यकर्त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरिता आपण हा निर्णय घेतला असल्याचे जोशी यांनी काल एका फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितले.मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढणार अशी जोरदार चर्चा यंदाच्या विधानसभेत होती. मुंबईत व्यग्र असल्याने फडणवीस यांनी पालक म्हणून जोशी यांच्यावरच जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वारसदार म्हणून जोशी यांचे नाव आघाडीवर होते.
तत्पूर्वी पद्वीधर मतदारसंघासाठीसुद्दा त्यांच्याच नावाची सुरुवातील चर्चा होती. भाजपने त्यांना मतदान नोंदणीची जबाबदारीसुद्धा सोपविली होती. महापालिकेतून निवृत्ती घेऊन जोशी आता विधानसभेची तयारी करणार, अशी जोरदार चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
जोशी महापालिकेचे सलग दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी जलप्रदाय समितीचे सभापतींसह विविध पदांवर त्यांनी काम केले. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.