सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकारवर लवकरच पडणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. रावसाहेब दानवेंपासून ते नारायण राणेंपर्यंत भाजपचे अनेक नेते वारंवार केला जात आहे. याआधी भाजप नेते नारायण राणे यांनी सप्टेंबरपर्यंत हे सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. आता राणेंनी आणखी एक नवीन डेडलाईन दिली आहे.
2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केला आहे. चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आले असताना ते बोलत होते.
येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, याआधी देखील नारायण राणेंनी महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचे दिसून येत असून, हे सरकार ऑगस्ट-सप्टेंबर अखेरपर्यंत पडेल असा दावा त्यांनी केला होता. रावसाहेब दानवे यांनी देखील हे सरकार 3-4 महिन्यात पडेल असा दावा केला होता.