मुंबई : सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या गंभीर आरोपाप्रकरणी सखोल सीबीआय चौकशी सुरु असून, सीबीआयने त्यांची तब्ब्ल १० तास कसून चौकशी केली आहे. दरम्यान, यात माजी गृहमंत्र्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मात्र दुसरीकडे अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत भाजप नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कायदेशीर पद्धतीने पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात जी नावं घेतली आहेत, त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब यांचंदेखील नाव घेतलं आहे असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी, सीबीआय चौकशीचा अहवाल १५ दिवसांच्या आत जाहीर होईल. त्यामध्ये अनिल देशमुखांचं खरं रूप बाहेर येईल आणि ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते, याचादेखील भांडाफोड होईल. तसचं अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेलं जाईल, चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही वक्तव्य केलं आहे.
तसेच सचिन वाझे प्रकरणावरूनही राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांना सापडलेला सचिन वाझे हा एक आहे. मात्र नजरेसमोर आलेले सचिन वाझे अनेक आहेत. राज्य सरकारला नको असलेल्या लोकांना जीवानिशी मारण्याचे काम सुरू आहे. आता एनआयएच्या तपासामधून अनेक बाबी बाहेर येतील, असा थेट दावाही नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पियोमध्ये ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, यात सचिन वाझे यांचे आलेले नाव. त्यानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यावा लागलेला राजीनामा, या सेवा घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे सातत्याने सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात असून, लवकरच अजून एक नेता राजीनामा देईल अश्या वावड्या देखील उठवल्या जात आहेत. तसेच सरकार लवकरच पडेल, अशा प्रकारच्या चर्चांनाही त्यांच्याकडून खतपाणी घातले जात आहे.