सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपने शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा दिल्यानंतर नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे यांनी ‘तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी प्रतिक्रिया दिली.
ते शनिवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून नारायण राणे यांना केंद्रातील मंत्रिपदाविषयी विचारणा झाली. तेव्हा खुर्चीत बसलेल्या नारायण राणे यांनी मागे वळून पाहिले. त्यानंतर तुम्ही हा मला प्रश्न विचारलात का, असेही विचारले. मला याबाबत काही माहिती नाही. पण तुमच्या तोंडात साखर पडो, असे नारायण राणे यांनी म्हटले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल नारायण राणेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं, दर्शन करावं तर यावर काय बोलणार? पण शुभेच्छा दौरा यशस्वी होवू दे, अशी टिप्पणी नारायण राणे यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह येत्या 6 फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले होते. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे शिवसेनेच्या कोकणातील या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला जमले, असे बोलले जात होते. त्यामुळे सध्या भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था बहाल केली होती. त्यामुळे नारायण राणे यांचे भाजपमधील वजन वाढल्याचे बोलले जात आहे.
Read Also
“समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजपा, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही”