अकोला : नाशिकमधील दुर्घटना मनुष्यवधच असून, दोषी ठेकेदारांवर कारवाई केली जावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांना आपला प्राण गमावावा लागला आहे. या घटनेने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याच पार्श्वभूमीवर ही घटना मनुष्यवधच असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यात जबाबदार काँट्रॅक्टरवर कारवाई होईल अशी अपेक्षा करतो. या घटनेत बळी पडलेल्या सर्वांना पक्षातर्फे, माझ्या व माझ्या कुटुंबातर्फे भावपूर्ण आदरांजली.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 21, 2021
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही घटना दुर्देवी आहे. शासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. शासनाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट वरती दिलेले आहे. टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
शासनाचा हा दुर्लक्षपणा असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.