मुंबई : केंद्र सरकार आज सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे. निवडणुका आल्या किंवा भाजपा अडचणीत आली की शेतकर्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा करण्याचा धंदा पंतप्रधान मोदींनी सुरू केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
नवीन कृषी कायदा हा शेतमालाची लुट करणारा कायदा आहे. भाजप पक्ष हा मुळात शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमात @BJP4India कार्यकर्तेच चर्चेला बसून खोटा प्रचार करतील अशी शंका आहे – ना. @nawabmalikncp@PMOIndia
— NCP (@NCPspeaks) December 24, 2020
सहा हजार रुपये शेतकर्यांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवता… हे नक्की काय चाललंय? शेतकर्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या संवादाला भाजपाचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीका मलिक यांनी केली.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून देखील मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्या भाजपने आधी स्वत:ची विश्वासार्हता दाखवावी, अशी टीका त्यांनी केली.