मुंबई : माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, असा दावा केला, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक यांनी, “सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये आणि धंदेबाज लोकांनी स्वतःचे धंदे बघावे, आघाडी सरकारमध्ये धंदेबाज लोकांची दखल घेतली जात नाही, असे धंदेबाज लोक कितीही आणि काहीही बोलले, तरी त्यांच्या बोलण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आमचं सरकार कसं चालवायचं ते आमचा आम्ही बघू”, असा हल्लाबोल संजय काकडेंवर केला आहे.
दरम्यान काकडेंनी, मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, तसेच, ते गेली २५ वर्ष युतीमध्ये होते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी वाईट वाटत आहे, अशा शब्दात माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.