सोलापूर – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांची सत्यता पडताळल्यानंतर दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले. हा धनंजय मुंडे यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी पोलिसांनी आपली तक्रार लगेच दाखल करून घेतली नसल्याचा आरोप केला. यावरही दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले. एखाद्याने तुमच्यावर आरोप केले तर पोलीस लगेच गुन्हा दाखल करू शकत नाहीत. त्यापूर्वी सत्यता पडताळावी लागते, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.