मुंबई : महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन लवकरच 1 वर्ष पुर्ण होणार आहे. एक वर्षापुर्वी सत्तास्थापनेसाठी आधी भाजप व त्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केलेल्या खेळी संपुर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. या घटनांविषयी लिहिलेले प्रियम गांधी-मोदी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकात अनेक दावे करण्यात आले आहे व याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेतल्याचा दावा या पुस्तकात केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाष्य केले असून, भाजपाचे काही ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यावेळी आमच्यासोबत सरकार बनवा असं सांगितलं होतं. परंतु शरद पवार यांनी आणि पक्षानं त्याला नकार दिला ही सत्य परिस्थिती आहे, असे म्हटले आहे.
अजित पवार यांनी त्यावेळी भाजपला पाठिंबा दिला होता. याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, त्यावेळी अजित पवारांनी काही चुका केल्या. त्यानंतर त्यांनी ती चुका दुरूस्तही केल्या आहेत. भाजपानं सत्तेसाठी जे काही केलं होतं त्यावर पडदा टाकण्यासाठी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकाची मदत घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, तसेच ज्यावेळी शिवसेना आणि भाजपा हे एकत्र येण्यास तयार नव्हते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही महत्त्वाची होती. कोणाच्याही सोबत गेलं तरी आम्ही सत्तेत जाऊ शकत होतो. परंतु त्यावेळी भाजपासोबत जायचं नाही हा निर्णय झाला होता.