अहमदनगर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूची अनावश्यक चर्चा घडवून आणण्यामागे बिहार विधानसभा निवडणुकीचं राजकारण असल्याचे आरोप आतापर्यंत अनेकदा झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून याचा पुरावाच दिला आहे.
सुशांतसिंह प्रकरणात भाजपनं मुंबई पोलिसांवर अकार्यक्षमतेचे आरोप केले होते. बिहारमध्ये सध्या भाजपसोबत सत्तेवर असलेल्या नितीश कुमार यांच्याकडूनही याला खतपाणी घातले गेले.
बिहार विरुद्ध मुंबई पोलीस अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती. सुशांतला न्याय मिळवून देणारच, अशी वक्तव्ये बिहारमधील राजकारणी व पोलीस अधिकारीही करू लागले होते. बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच हे सगळं घडवून आणलं जात असल्याचा आरोप करण्यात येत होता.
राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार यांनी आता देशातील आघाडीच्या दैनिकांमध्ये आलेल्या बातम्या व भाजपच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर ट्वीट करून या राजकारणाचा पुरावाच दिला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार नेमकं
‘सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात आहे. आधी म्हटल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा अजेंडा आहे. पण या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
#Justice4SSR साठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा. pic.twitter.com/rEFxwg4Gjb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 6, 2020