मुंबई : सीमेवर आपले जवान उणे ५० अंश सेल्सिअस एवढ्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत भक्कम पाय रोवून उभे आहेत. त्यांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
लष्कर उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी यांनी जवानांसाठी आवश्यक असलेल्या उबदार कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट केली आहे. यात रोहित पवार म्हणाले की, जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. आयात थांबवून आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, असं वक्तव्य सैनी यांनी केले आहे. त्यांचा हा विचार मला खूप आवडला. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलाच आहे, तर त्याची सुरवात जवानांसाठी लागणाऱ्या साहित्यापासून करायला हरकत नाही. आणि फक्त आत्मनिर्भर होऊनच भागणार नाही तर या साहित्याचा दर्जाच एवढा उत्तम असेल की आपण त्याची निर्यातही करू शकू. कारण आपल्या देशात बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी आणि मनुष्यबळ मुबलक आहे. विशेष म्हणजे आज सीमेवरील स्फोटक स्थिती लक्षात घेता याची गरज आणि संधीही आहे.
त्यासाठी देशातील कंपन्या आणि युवांना चॅलेंज दिलं तर आपल्या देशातील टेक्सटाईल उद्योगातील अनेकजण योग्य डिझाईनचे दर्जेदार कपडे नक्की बनवून देतील, याबाबत काही शंका नाही. पण या तयार कपड्यांची खरेदी लालफितीत न अडकता तातडीने कशी होईल, याकडंव तेवढंच लक्ष द्यावं लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, उच्च दर्जाचे मास्क आणि PPE किट आपण फक्त तयारच करत नाही तर निर्यातही करत आहोत. हाच अनुभव जवानांना लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीतही आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय याचा दुहेरी फायदा आहे तो म्हणजे आपलं परकीय चलन वाचेल आणि निर्यातीतून त्यात भरही घालता येईल. म्हणून आज त्याची अधिक गरज आहे.
आत्मनिर्भर होण्याच्या लष्कर उप प्रमुखांच्या विधानाचं स्वागत करुन त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने जरूर पावलं उचलावीत, असे आवाहन देखील त्यांनी सरकारला केले.