अहमदनगर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला केला. मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचं नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्ग लागेल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर आजवर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे,” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं.
“जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडान त्यांना उत्तर द्याल, शरमेनं मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजेंनी सत्तेतील मराठा नेत्यांनाही सवाल केला आहे