उस्मानाबाद : आधी कोरोना संकट, त्यानंतर अतिवृष्टी यामुळे राज्यात मोठे संकट आहे. अशात मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नसल्याची टीका सातत्याने विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.
आम्हीच कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. आम्ही दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मुख्यमंत्री काम करीत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.
शरद पवार सध्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. तुळजापूर दौऱ्यावर असताना ते म्हणाले की, ज्यावेळी अशा प्रकारचं मोठं संकट येतं तेव्हा महत्त्वाच्या व्यक्तिंनी मुंबईत एका ठिकाणी बसून नियोजन करणं आवश्यक असतं. प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून काय उपाय योजना करावी लागेल याचा आढावा घ्यायला लागतो. आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते.